Mohini Varde
ज्या काळात स्त्रिया नुकत्याच कोठे शिक्षण घेऊ लागल्या होत्या त्या काळात, परदेशी जाऊन डॉक्टरीविद्या संपादन करणाऱ्या दोन महाराष्ट्रीय स्त्रियांपैकी एक डॉ. आनंदीबाई जोशी व दुसऱ्या डॉ. रखमाबाई सावे आणि पेशा म्हणून डॉक्टरी व्यवसायाचा अंगिकार करणाऱ्या डॉ. रखमाबाई ह्या पहिल्याच महिला डॉक्टर.डॉक्टर होण्यापूर्वीच रखमाबाईंचे नाव येथे गाजले होते, ते त्यांच्या जीवनातील एका अपूर्व घटनेमुळे. रखमाबाईंचे बालवयात लग्न झाले होते; परंतु त्या आपल्या माहेरीच राहत होत्या. बुद्धीने, विचाराने रखमाबाई जसजशा प्रगल्भ होऊ लागल्या, त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेक अंगांनी फुलू लागले, तसतशी आपल्या नवऱ्यातील व स्वतःतील बौद्धिक दरी त्यांना जाणवू लागली. व्यसनी, अडाणी व परावलंबी पतीबरोबर संसार करणे या तेजस्वी स्त्रीला केवळ अशक्य होते. त्यांनी या लग्नाविरुद्ध बंड पुकारले. त्यांच्याभोवती एक प्रचंड वादळ निर्माण झाले. त्यांच्या पतीने त्यांच्याविरुद्ध खटला भरला. समाजाने विविध प्रकारचे आरोप रखमाबाईंवर केले. परंतु सर्व प्रकारचे मानसिक त्रास सोसूनही, त्या स्वत:शी अप्रामाणिक झाल्या नाहीत. शेवटी त्यांच्या पतीनेच माघार घेतली.मोहिनी वर्दे यांनी चिकित्सक व सत्यनिष्ठ संशोधकाच्या भूमिकेतून या तेजस्वी स्त्रीच्या आयुष्याचा शोध घेतला आहे. हे चरित्र जणू रखमाबाईंच्याच ’हृदयीचे आर्त’ वाटावे इतक्या त्या रखमाबाईंच्या भावनांशी, विचारांशी, संघर्षाशी समरस झाल्या आहेत. रखमाबाईंच्या बरोबरच तो सबंध काळ, त्या काळातील समाजजीवन, विचारसंघर्ष, त्या काळाची भूमिका व दृष्टिकोन मोहिनीबाईंनी जिवंत केला आहे. त्यामुळे वाङ्मयाप्रमाणे समाजशास्त्रात रस असणाऱ्या वाचकांनाही हे चरित्र एक वेगळाच आनंद देईल.